एक म्हातारी विधवा बाई होती. स्वच्छता, टापटीप या गोष्टी तिला फार आवडत असत. सगळी कामे वेळच्यावेळी झाली पाहिजेत असा तिचा आग्रह असे. तिने दोन मोलकरणी ठेवल्या होत्या. पहाटे कोंबडा आरवला की म्हातारी स्वतः उठायची, मोलकरणींना उठवायची, आणि त्यांच्याकडून सगळी कामे करून घ्यायची. मोलकरणींना पहाटे उठायचा फार कंटाळा येई. एक दिवस एक मोलकरीण म्हणाली, “हा कोंबडा आपला शत्रू आहे. तो म्हातारीला उठवतो, त्यामुळे ती आपल्याला उठवते.” दुसरी म्हणाली, “आपण त्या कोंबड्याला नाहीसे करू या.” दोघींनी मिळून कोंबड्याला ठार मारले.आता म्हातारी फारच लवकर उठू लागली आणि मोलकरणींना उठवू लागली. एकदा तर ‘चला, पहाट झाली, लवकर उठा...’ असे म्हणून म्हातारीने त्यांना मध्यरात्रीच उठवले आणि कामाला लावले. मोलकरणींना ‘कोंबडा होता तो बरा’ म्हणायची पाळी आली.
इसापच्या नीतिकथा