उमेदीच्या काळात आणि तारुण्यामध्ये समाजसेवेला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना वार्धक्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. पैशाअभावी औषधोपचारांपासून दैनंदिन जगण्यातल्या अडचणी भेडसावत राहतात. अशा कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने 'समाजसेवक सहाय्यता निधी' योजना सुरु केली आहे. समितीच्या या अभिनव उपक्रमामुळे विविध क्षेत्रांमध्ये निरपेक्ष वृत्तीने काम केलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मदतीचा हात मिळणार आहे. राज्यामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहेत. व्यसनमुक्ती, सामाजिक सुधारणा, महिला सबलीकरण, मुस्लीम सत्यशोधक कार्य, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात काम केलेल्या कार्यकर्त्यांसाठी ही योजना लाभदायी ठरु शकणार आहे. अनेक कार्यकर्त्यांना पैसे नसल्यामुळे दैनंदिन अडचणी भेडसावतात, आजारपणात औषधोपचार करता येत नाही, शस्त्रक्रिया होऊ हाकत नाहीत. याचा विचार करुन समितीने या योजनेची आखणी केली आहे. योजना राबविण्यासाठी राज्यभरातील विविध संस्थांना समितीमार्फत पत्र पाठवून अशा अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांची माहिती मागविली जाणार आहे. राष्ट्र सेवा दल, मुस्लीम सत्यशोधक मंडळ, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, सेवा वस्तीमध्ये करणाऱ्या संस्थांसह ८० संस्था निवडण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ५० संस्थांना पत्र पाठविण्यात येणार आहेत.
निवडीचे निकष ठरविण्यात आलेले असून वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच हा लाभ दिला जाणार आहे. या कार्यकर्त्यांनी किमान बारा वर्ष पूर्ण कार्यकर्ता म्हणून काम केलेले असावे असेही कार्यवाह शैलेन्द्र बोरकर यांनी स्पष्ट केले. रा.स्व.संघाच्या एका स्वयंसेवकाने कोटी रुपयांची देणगी जनकल्याण समितीला दिली आहे. त्यातून हा उपक्रम चालवला जाईल.
लोकमत २८.१२.१७