बीजिंग- संबंध सुधारण्याच्या दृष्टीने भारत आणि चीनने एक पाऊल पुढे टाकले आहे. २०२० पासून रद्द केलेली कैलास-मानस यात्रा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चीन दौऱ्यावर असलेले भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी वँग यी यांची भेट घेत विविध मुद्दयांवर चर्चा केली. त्यानंतर मिस्त्री यांनी ही घोषणा केली
परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध करत या भेटीबाबत माहिती दिली. "कैलास मानस सरोवर यात्रा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय झाला असून भारत चीन थेट विमानसेवाही सुरू करण्याचे तत्त्वत: मान्य करण्यात आले आहे. दोन्ही देशातील लोक, माध्यमे आणि विचारवंत यांच्यातील भेटीगाठींना प्रोत्साहन दिले जाणार आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
कैलास पर्वताप्रमाणे, मानस सरोवरही तीर्थस्थळ असून,भारत व इतर देशातील भाविक इथे येतात. मानस सरोवरात स्नान करून तेथील पाणी प्यायल्यास सर्व पापे माफ होतात असा विश्वास आहे. दरवर्षी भारतातून कैलास मानस सरोवर यात्रा आयोजित केली जाते. हिंदू धर्मातील कथांनुसार या तळ्याचे निर्माण ब्रह्मदेव यांनी आपल्या मनात केले त्यामुळे याचे नाव मानस सरोवर आहे (संस्कृत मध्ये मानस = मन) + सरोवर = तळे).
सकाळ २८.१.२५