पुणे, ता. १७ : शहरी भागातील तापमानात होणारी वाढ म्हणजेच अर्बन हीटची (शहरी उष्णता) समस्या अलीकडच्या दशकात मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. वाढते शहरीकरण, काँक्रिटीकरण, प्रदूषण यामुळे शहरी भागातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ही समस्या कमी करण्याच्या अनुषंगाने व शहरी उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी पुण्यातील विश्वकर्मा विद्यापीठातील अभ्यासकांनी एक संशोधनात्मक अभ्यास करत टेरेस गार्डनचे महत्त्वपूर्ण योगदान स्पष्ट केले आहे. या समस्येवर एक पर्यावरणपूरक उपाय शोधून काढण्यात अभ्यासकांना यश आले आहे. टेरेस गार्डनच्या प्रयोगाद्वारे शहरी उष्णतेला कमी करता येईल असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
या संशोधनाची माहिती नुकतीच 'नेचर' या जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. त्यानुसार एका इमारतीच्या छतावरील गार्डन असलेल्या भागाच्या आणि उघड्या भागाच्या, तापमानातील फरक तपासण्यात आला. त्यात असे आढळून आले, की टेरेस गार्डन असलेल्या खोल्यांच्या तापमानात जास्तीत जास्त १५ अंश सेल्सिअसपर्यंतची घट पाहायला मिळाली. या अभ्यासात विश्वकर्मा विद्यापीठाचे पीएच.डी.चे विद्यार्थी गिरीश विश्वनाथन आणि प्राध्यापक डॉ. कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील संशोधनात डॉ. योगेश सूर्यवंशी, डॉ. विशाल मेश्राम आणि डॉ. श्रीकांत जाधव यांनी सहभाग घेतला आहे.
डॉ. योगेश सूर्यवंशी, म्हणाले, “आम्ही हरित पायाभूत सुविधा आणि थर्मल कम्फर्ट यांच्यातील संबंधांचे विश्लेषण करण्यावर काम केले. या संशोधनातून शहरी भागात शाश्वत, ऊर्जाक्षम आणि थंड वातावरण तयार करण्यासाठी टेरेस गार्डन हा एक व्यावहारिक आणि प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध होते. जागतिक स्तरावर विशेषतः संयुक्त राष्ट्राच्या शहरी हिरवळ प्रकल्पांना चालना देण्यासाठी या अभ्यासाचे परिणाम महत्त्वाचे आहेत. यामुळे शहरी नियोजन व धोरण निर्मात्यांना भविष्याच्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी दिशा मिळू शकते.”
सकाळ १८.१.२४