किल्ले अतिक्रमणमुक्त होणार - मुख्यमंत्री
SV 20-Feb-2025
Total Views |
आपटाळे, ता. १९ : "महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी स्फूर्ती आणि तेज शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरील मातीमधून मिळते. छत्रपती शिवरायांनी स्वतः करिता काही केले नाही, त्यांनी संपूर्ण आयुष्य हे रयतेच्या कामी लावले. त्यांचे गडकिल्ले हे मंदिरापेक्षा मोठे असून, या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी राज्यात 'टास्क फोर्स' तयार करण्यात आला असून, महाराजांच्या गडकिल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
किल्ले शिवनेरी येथे छत्रपतो शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेप्रसंगी शिवभक्तांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून सर्वांत प्रथम भारताचा आत्माभिमान जागरूक करण्याचे काम केले. ते आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. ते केवळ योद्धे नव्हते, तर उत्तम प्रशासक, पर्यावरणाचे, जलाचे आणि जंगलांचे संवर्धक, तसेच विविध प्रकारच्या व्यवस्थापनशास्त्राचे गुरू होते. म्हणूनच आपण त्यांना आदर्श व जाणता राजा, असे म्हणतो.