गोव्यासह मुंबई, वसईत लवकरच जल मेट्रो
SV 27-Feb-2025
Total Views |
गोव्यात येणाऱ्या लाखो पर्यटकांना जादा सुविधा देण्यासह राज्यातील पर्यटन अधिकाधिक आकर्षक व्हावे, यासाठी राज्यात 'जल मेट्रो' सुरू करण्यासंदर्भात चाचपणी सुरू झाली आहे. यासाठी देशभरातील नद्यांचाही वापर करण्यात येणार आहे.
देशातील १३ राज्यांमधील १७ शहरांमध्ये पूर्णतः अथवा अंशतः जलमेट्रो सुरू करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई आणि वसई या शहरांचा समावेश आहे. या प्रस्तावावर अभ्यास चालू असून हा व्यवहार्यताविषयक अभ्यास करण्यासाठी कोची मेट्रो रेल्वे या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यासह अयोध्या, कोलकाता, प्रयागराज, पाटणा, श्रीनगर, वाराणसी, मुंबई, वसई, मंगलोर, अहमदाबाद या शहरांची आणि जेथे बेटांतर्गत फेरीसेवांमुळे संपर्क व्यवस्थेत स्थित्यंतर घडून येऊ शकेल अशी केरळमधील अल्लेप्पी तसेच लक्षद्वीप तसेच अंदमान आणि निकोबार बेटांची निवड केली आहे. अशी माहिती उपलब्ध झाली आहे. शहराचा मुख्य भाग आणि परिसरातील महानगरपालिका, पंचायत क्षेत्रे, बेटे यांना ही शहरी जल वाहतूक प्रणाली जलमार्गाने जोडेल आणि या प्रणालीचे वाहतुकीच्या इतर मार्गांसोबत एकत्रिकरण देखील करण्यात येईल. तसेच ही प्रणाली पर्यटन आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला देखील चालना देईल.
पुढारी २५.२.२५