प्रतापगडाच्या पायथ्याशी 'पार्वतीपूर' नावाचे एक गाव आहे. नंतर त्यांचे 'पार'असे नाव पडले. या पार गावाजवळ शिवरायांनी एक पूल बांधून घेतला होता.८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा. कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असा हा भक्कम दगडी पूल आहे. पुलाला असणाऱ्या पाच आधारांवर पुलाच्या चार कमानी तयार झाल्या आहेत. त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या कमानींना धोका पोहचु नये म्हणून कमानी मधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो. हे सारेच बांधकाम फक्त चुन्यात केलेले आहे.सुमारे साडेतीनशे वर्षांनंतरही हा पूल अद्याप एकही चिरा न ढासळता शाबूत आहे. दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभर उंचीचा १ फूटी दगडी कठडा आहे. आपण ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांचे १०० वर्षे झाली म्हणुन कौतुक करतो. या पुलाला ३५० वर्षे होऊनही अद्याप एकही तडा गेला नाही अथवा दगडही निसटला नाही.