'वक्फ बोर्डा'च्या विरोधात हजारो चर्चेस एकवटली

30 Dec 2024 10:32:53
 
 कोची : 'वक्फ बोर्ड सुधारणा विधेयका'ला मुस्लिम समाजाचा विरोध आहे. तर, हिंदू संघटना विधेयकाच्या बाजूने बोलत आहेत. देशभरात या विधेयकावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. परंतु, केरळमध्ये 'वक्फ बोर्डा'च्या मनमानी कारभाराविरोधात एक हजार चर्चेसनी मोर्चा उघडला आहे. केरळमधील या चर्चेसमधील लोकांनी आरोप लावला आहे की, 'वक्फ बोर्ड' मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांच्या जमिनींवर कब्जा करत आहे. चर्चचा हा विरोध कोचीतील मुनंबम आणि चेराई गावातील जमीन वादावर आहे. या गावातील गावकऱ्यांच्या जमीन आणि मालमत्तेवर वक्फ बोर्डाने बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी 'वक्फ बोर्डा' विरोधात मोर्चा उघडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात ख्रिश्चन कुटुंबे राहात आहेत. दीर्घकाळ ती त्यांच्या मालमत्तेवर सरकारी करही भरत असून त्यांच्याकडे कागदपत्रेही आहेत. मात्र, आता या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. जमिनीची नोंदणी स्थानिक गावकऱ्यांच्या नावे आहे, मग त्यावर वक्फ बोर्ड दावा कसे करू शकते, असा सवाल या गावकऱ्यांनी केला आहे. या मुद्यांवरून सध्या चांगलेच राजकारण पेटले आहे. केरळमध्ये ज्या जमिनीवर 'वक्फ बोर्ड' दावा करत आहे, त्यावर कित्येक पिढ्या ख्रिश्चन कुटुंबे राहात आहेत.
आंदोलन आणखी चिघळणार :
वक्फ बोर्डाने केलेल्या दाव्यामुळे हा विषय इतका चिघळला आहे की, ख्रिश्चन कुटुंबांच्या अनेकांनी याविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ठिकठिकाणी लोकांचा विरोध वाढत आहे. जर हा मुद्दा निकाली काढला नाही, तर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिरो मलबार चर्चचे मुख्य मेजर आर्चबिशप राफेल थाटिल यांनी केंद्र आणि राज्य सरकारला मुनंबमप्रकरणी हस्तक्षेप करून तोडगा काढण्याची मागणी केली आहे. वक्फ बोर्डाच्या दाव्याविरोधात रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी जे आंदोलन झाले, त्याचे नेतृत्व सिरो मलबार चर्चने केले.

मुं.तरुण भारत १२.११.२४
Powered By Sangraha 9.0