लिंबूवर्गीय फळांची साठवण
फळांचे आयुष्य वाढविणे म्हणजे पर्यायाने ग्राहकाला अधिक काळपर्यंत फळे उपलब्ध करून देणे हा साठवणुकीचा मुख्य उद्देश असतो. उत्पादनानंतर फळे केवळ साठवणीच्या सोयीअभावी नाश पावतात. काढणीनंतर फळांच्या अंतर्गत जैविक आणि रासायनिक क्रिया अखंडपणे चालू असतात. यामध्ये बाष्पीभवनाची क्रिया, श्वसनाची क्रिया व पिकण्याची क्रिया याचा अंतर्भाव होतो. या सर्व क्रिया वातावरणाच्या तापमानाशी संबंधित असतात. म्हणून त्यांची साठवण कमी तापमानाला आणि योग्य त्या आर्द्रतेला केल्यास वर सांगितलेल्या क्रियांचा वेग मंदावतो.
दुसरी बाब म्हणजे कमी तापमानाला सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव कमी असतो. लिंबूवर्गीय फळे योग्य साठवण केल्यास त्याचे आयुष्य दुपटी तिपटीने वाढते. देशात लिंबू (Lemon) उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा चौथा क्रमांक लागतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर लिंबाच्या उत्पादनामध्ये अनुक्रमे मेक्सिको, भारत आणि अर्जेंटिना या देशांचा समावेश होतो. संपूर्ण भारतामध्ये लिंबाचे सुमारे १८ लाख मेट्रिक टन इतके उत्पादन घेण्यात येते. त्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे १.४० लाख मेट्रिक टन इतक्या लिंबाचे उत्पादन घेतले जाते.
लिंबाच्या उत्पादनामध्ये भारतानंतर अर्जेंटिना या देशाचा क्रमांक लागत असला तरी लिंबू निर्यातीमध्ये अर्जेंटिनां या देशांचा आंतराराष्ट्रीय स्तरावर ४९ टक्के इतका वाटा आहे. भारतामधून होणाऱ्या लिंबाच्या सुमारे १३ हजार मेट्रिक टन इतक्या निर्यातीपैकी जवळ जवळ ८५ टक्के लिंबाची निर्यात ही केवळ संयुक्त अरब राष्ट्रांना केली जात असून, इतर आयातदार देशांमध्ये नेपाळ, सौदी अरेबिया, मालदीव, ओमान आणि जर्मनी या देशांचा प्रामुख्याने सहभाग आहे.
कृषि पणन मित्र- नोव्हेंबर २०२४