भारतीय नौकानयनाला प्राचीन काळापासून वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. सिंधू संस्कृती ते पूर्वमध्यकाळापर्यंत समुद्र प्रवास कधीच निषिद्ध नव्हता. पूर्वमध्य युगात धर्मशास्त्रांनी समुद्र प्रवास करणे निषिद्ध ठरवल्याने नौकानयनाला अवकळा आली. मात्र याला छेद देण्याचे काम भारतात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपवाद वगळता अन्य शासकांना शक्य झाले नाही.
वसाहतवादी मानसिकता असलेल्या युरोपीय देशांतील व्यापाऱ्यांनी हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील अनेक छोटी-मोठी बंदरे व्यापाऱ्याच्या निमित्ताने येऊन हळूहळू गिळंकृत केली. हे लक्षात येऊन महाराजांनी आरमार उभारणीस प्रारंभ केला.
आरमार उभारणीच्या दृष्टीने उत्तर कोकणातील उल्हास नदीतील कल्याण आणि भिवंडी या बंदरांमध्ये जहाज बांधण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. सुवर्णदुर्ग, कल्याण आणि विजयदुर्ग या आरमारी ठाण्यांसोबत त्यांनी स्वतःची गलबते बांधण्यास सुरुवात केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ च्या जुलैमध्ये २० जहाजांचा पहिला काफिला बांधून सागरात आणल्याचा उल्लेख पोर्तुगीज कागदपत्रातून आढळतो.
डॉ.सुरेश शिखरे.
संपादकीय, पुढारी